Friday 10 June 2016

'डुप्लीकेट' लोकशाही

(मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

बबन्यानं दुकानाचं दार आपल्याकडे ओढून कडी, कुलूप काढलं. दुकान उघडून मेजावर, खुर्चीवर आणि सामानावर फडकं मारुन तो फतकल मारीत लाकडाच्या खुर्चीत बसला. आज दुकान उघडायला जरा उशीरच झाला होता.आपलं रोजचं गिऱ्हाईक लांब असलेल्या दुसऱ्या दुकानात गेलं कि काय अशी शंकाहि त्याच्या मनात आली. पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनाने त्याची शंका खोडून काढली. कारण त्या दुकानात उधारी चालत नसे. बबनराव बऱ्यापैकि उधारी ठेवत म्हणून गावकरी बबन्याच्याच दुकानात जास्त जातदुकान उघडायला जरा उशीर झाला तरी जरा कड काढतंच.
आता खेड्यातलं दुकान म्हणल्यावर त्यात विकायला दुसरं काय असणार साखऱ्या अन् पत्ति.
पण नाही बबन्याने साखर, पत्तीपासून ते पार पेट्रोल आणि मोबाईल रिचार्ज पर्यंत सगळं ठेवलं होतं. नुसत्या साखऱ्या अन् पत्तिनं घर चालवायचं कसं?
बबन्या खुर्चीत बसतोय न बसतोय तोवरच त्याची भोवनी दारात हजर होती.
"काय बबनराव लई उशीर केला दुकान उगडायला?" आल्या आल्या शंकरआपाच्या बंड्या ने विचारलं.
"हां, जरा उशीरच झाला बग." बबन्या, बंड्याचा रोजचा खुराक 'सुर्य छाप' ची पुडी काढत बोलला.
"जरा लवकर उगडत जा कि राव, कामं खोळंबत्यात 'सकाळची'" एवढ बोलून बंड्याने शर्टच्या खिशातून पाचशेची नोट काढली.
बबन्या 'सकाळची' कोणती कामं हे उमजून मान हलवत होता. बंड्याने नोट काढली तसा तो बोलला.
"चिल्लर दे रे, चिल्लर ची लय बोंब हाये बग."
"आरं म्या तरी कुटंनं आणू रं, न्हायी कि चिल्लर." बंड्या खिसे चाचपत बोलला.
"आरं भवनीच तुज्या हातून हाये आज; बग असतेल." बबन्या आशाळभूत नजरेने बंड्याकडे बघत होता.त्याचा एक दंडक होता. एरव्ही कितीही उधारी होऊ द्या पण भोवनीच्या वेळेस तो रोख पैसे घ्यायचा.
भोवनी ला उधारी केली कि त्या दिवशी धंदा चांगला होत नाही असा त्याचा समज होता.
आणि हे माहित असल्यामुळेच बंड्याने जाऊन कुठून तरी १० रुपये आणून बबन्याच्या हातात एकदाचे टेकवले.
बंड्या गेला अन् पकाभाऊ बिड्या घ्यायला आले. आले तसे त्यांनी हजाराची नोट पुढं करून बिड्यांच बंडल मागितलं.
"पकाभाऊ धा रुपायच्या बंडलाला हजाराची नोट व्हय?" बबन्या करवादला.
"आरं चिल्लर न्हायी कि." पकाभाऊ खोलवर खिशात हात घालत बोलले.
"बरं, ऱ्हाउद्या आता, पुन्ना द्या." बबन्या उधारीची वही काढत बोलला.
"हां बराय, टिपून ठेव बाबा परत इसरायचो म्या." असं म्हणून ते घाई घाईत निघून गेले.
अजून एक दोन गिऱ्हाईकासोबत वरील वाक्यांचीचं उजळणी झाली तसं बबन्या विचारात पडला.
"ह्याच्या बायला, काय सगळ्यासंनीच काय घबाड गावलं का काय?, कोण पण येतंय अन् हजार, पाचशेची नोट काडतंय. ते आप्याचं बंड्या खिशात कदि दमडा नसतो त्यच्या, उधारी झाली कि बापाकडनं मागून धा, पाच रुपये हातावर टेकावतय अन् आज त्यानं पण पाचशेची नोट काडावी?"
असे काहीसे आश्चर्याचे भाव बबन्याच्या चेहऱ्यावर होते, तेव्हाचं पक्यानं दुकानात पाय टाकला.
बबन्याने वासलेला 'आ' त्याने आपल्या डाव्या हाताने हनवटी वर करून मिटवला अन् त्याने आपली टकळी चालू केली.
"काय बबनराव, आज गिराईक जंक्शन दिसतंय."
"अरं गिराईक हाय माइदंळ पण त्याच्या बायला सगळं उसनवारीच हाये कि रं."
"उसनवारी कामून गडे कालच तर विलेक्शन झालेत कि?" पक्या 'अर्थ'पूर्ण नजरेने बबन्याकडे बघून गालात हसत होता.
त्याची नजरच अशी बेरकी होती कि त्याला काय म्हणायचं होतं ते बबन्याला बरोब्बर कळलं. अन् मघाशी पडलेलं कोडं देखील त्या सरशी सुटलं.
"अरं त्याच्या बायला तरीच म्या म्हनलं, कोणीई येतोय हजार, पाचशेचिच नोट काडतोय, ज्याच्या खिशात रुपया सापडायचा नाही ते लोकं आज हजाराची नोट काडतायत. काल विलेक्शन झालेत नायि का?
बबन्या स्वतःशिच बोलल्यासारख बोलला अन् एकदम भानावर येउन तो पक्याला उद्देशून बोलला.
"पकाभाऊ बरं झालं तुमी आलात अन् हे कोडं सुटलं. नायि तर म्या असच बसलो असतो इचार करत. हे घ्या तुमाला गोवाची पुडी आपल्याकडंन, कोडं सोडिवल्याबद्दल." असं म्हणून त्याने एक पुडी पक्याच्या हातावर ठेवली.
कालच विधानसभेचे इलेक्शन झाले होते. शेजारच्या उंबरा गावचेच आमदार साहेब या वेळेस परत उभे होते. नव्याण्णव किलोचे हे आमदार आसपासच्या भागामध्ये बरच 'वजन' राखून होते. आणि तेच निवडून येणार अशी शक्यता नाही तर खात्रीच त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
आमदारांनी पण काय कमी खर्च केला नव्हता. कार्यकर्त्यांना गाड्या म्हणू नका, गाडीचा पेट्रोल भत्ता म्हणू नका, रोजचा अलाउन्स म्हणू नका. झालंच तर रात्रीची सोय म्हणून रांजणभरून देशी अन् चकण्याला मीठ आणि फरसाण अशी सगळी व्यवस्था त्यांनी प्रचाराच्या दरम्यान केली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी इलेक्शनच्या आदल्या दिवशी एका मताला हजार रुपये प्रमाणे जवळ पास एक, सव्वा करोड रुपये वाटल्याची कुजबुज साऱ्या गावानं ऐकली होती.
आमदार साहेबांना पण निवडून येण्याची पक्की खात्रीच होती अन् ते मुंबईला जाण्याच्या तयारीला देखील लागले होते.
 "बरं काये देऊ बोला." बबन्या ने पुढे विचारलं.
"आपल्याला एकाने काय होतंय बबनराव, द्या पन्नासाची माळ" असं म्हणून त्यानं खिशातली हजाराची नोट काढून बबन्या पुढे धरली.
हजाराची नोट बघून प्रथम बबन्याच्या कपाळावर आठी चढली पण लागलीच दोघेही हसत सुटले.
खुळेवाडीत जशी चिल्लरची बोंब होती तशीच काहीशी परिस्थिती आमदार साहेबांच्या कृपेने पंचक्रोशीतील गावामध्ये होती. त्यातून तालुक्याचे गावही सुटले नव्हते.
एक दोन दिवस चिल्लरची वाट 'बघून' तसचं लोकांकडे पैसे असूनही गावावरची आपली उधारी वाढत चाललेली 'न बघवल्यामुळे' तिसऱ्या दिवशी बबन्यानं दुकान भावाच्या हवाली करून, काखेत पिशवी मारून थेट तालुक्याची बँक गाठली.
बँकेतला कॅशीअर ओळखीचाच होता. जायचं अन् पाच एक हजार रुपायची चिल्लर घेऊन यायचं असा साधा 'हिशेब' त्याने मनाशी लावला होता. पण झालं भलतच.
बबन्याने कॅशीअरकडे चिल्लरसाठी विचारून पाच हजार रुपये काउंटरच्यावर आलेल्या हातात दिले अन् तो आपल्या गावातल्या वसुलीचे स्वप्न पहात उभा राहिला.
"काय बबनराव आज अगदी कोऱ्या करकरीत नोटा" कॅशीअरने एक नोट निरखत विचारलं.
"हा खरंय" त्याचं बोलणं बबन्याने हसून साजरं केलं.
"काय ए टी एम मधून काढले काय पैसे?"
"अं …… न्हायी आपलं ते …व्ह्य"
"अच्छा, कुठल्या ए टी एम मधून काढले.?"
बबन्याला काही कळत नव्हतं कि आज कॅशीअर एवढी चौकशी का करतोय? याआधीहि बबन्याने चिल्लर करून नेले होते. ओळख असल्यामुळे काय, यायचं अन् फक्त कशी कशी चिल्लर पाहिजे ते सांगायचं. जर असतील तर देतात. असा त्याचा आज पर्यंतचा अनुभव होता. पण आज हे भलतंच काही तरी होतंय,
या विचारात असतानाच कॅशीअरने परत विचारलं.
"कुठल्या ए टी एम मधून काढले?"
"ए टी एम मदुन न्हाई, यका दोस्तानं दिलते."
"कोणाकडणं भेटले तुम्हाला.?"
"सायेब झालया तरी काय?" बबन्याने अगदी न राहवल्यामुळे शेवटी विचारलंच.
साहेब अजून नोटा निरखून बघतच होता. आता त्याच्या मागे अजून एक दोघं सोबतीलाही होते. अन् त्याच नोटा बघून आपापसात काहीतरी कुजबुजत होते.
"बबनराव ह्या नोटा 'डुप्लीकेट' आहेत" कॅशिअर एक दीर्घ निश्वास टाकून बोलले.
ते ऐकून बबन्याचा चेहरा पांढरा फटक पडला. आता आपल्याला पोलिसात देतील ह्याची भिती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही न उमजून त्याच्या तोंडून शब्द गेलेच.
"म्हंजी?"
"अहो ह्या नोटा 'नकली' आहेत, कोणी तरी खऱ्या म्हणून तुम्हाला दिल्यात." असं म्हणून त्यांनी दोन्ही हात नोटेच्या मधोमध घेऊन ति फाडणार तेवढ्यात बबन्या ओरडला.
"वो सायेब अवो काय करताय?"
"अहो हि नकली नोट आहे. आम्हाला वरून तसे आदेश असतात नकली नोटा फाडून टाकायच्या म्हणून."
"पर अवो माजे पैशे कोन देईल मंग भरून."
"अहो त्यात आम्ही काही करू शकत नाही. बरं थांबा, मला हा शिक्का तर मारावाच लागेल ह्या नोटेवर." असं म्हणून त्यांनी एक लाल शाई असलेला "नकली नोट" असा शिक्का त्या नोटेवर मारला.
"अवो पर मंग ती नोट कोण घ्यायचा न्हाई कि." बबन्या एवढं बोलेपर्यंत तर कॅशीअरने आपलं काम चोख केलं होतं. .
नोटांकडे बघून बबन्या बोलला.
"अवो सायेब आता हि नोट कोन घेईल आमच्याकडून, असा शिक्का मारल्यावर."
"अहो त्या नकली आहेत आणि तुम्ही पण सरकारला मदत करायला पाहिजे अशा नोटा फाडून."  कॅशिअर मान खाली घालून काही तरी लिहीतच बोलला. 
"पर अवो आमचे पैशे बुडले कि ह्याच्यात."
"हे बघा, मी काहीही करू शकत नाही. एक काम करा त्या तिकडे मानसं दिसतायत का कोपऱ्यात? म्यानेजर साहेब येण्याची वाट पाहतायेत तिकडे उभे रहा. त्यांना सांगून सांगून दमलोय आम्ही यात काही करून शकत नाही तुम्हालाहि तेच सांगतोय. ते सगळे 'नकली' वालेच आहेत"
"काय"? बबन्या जोरात ओरडला.
"अहो नाही तर काय फुकटची डोकेदुखी आहे, कालपासून जवळ पास एक लाख रुपयाच्या नकली नोटा बँकेत आल्यात आणि बाकीही बँकेत हीच अवस्था आहे." कॅशीअरने सगळी परिस्थिती सांगितली.
बबन्या त्या उभ्या असलेल्या समदु:खी लोकात ‘मयताला’ आल्यासारखा येउन उभा राहिला. त्यांच्यात त्याला एक दोघे बाजूच्या गावामधले देखील दिसले. पण कोण ओळख दाखवत नव्हते. त्याच्या गावचं मात्र कोण नव्हतं.
"काय तुमची पण नकलीच का?" एकाने बबन्याला "चांगले होते नाही बिचारे?" च्या थाटात विचारलं.
"ह्वो, तुमचे किती व्हते?" बबन्याने उलट प्रश्न केला.
"धा हजार."
"माजे पाच" न विचारताही बबन्याने उत्तर दिलं.
नकलीवाल्यांमध्ये कोणी चिल्लर करायला बँकेत आले होते; कोणी कशा, कशाचे हप्ते भरायला. अन् एखादा बँकेत पैसे ठेवायला.
लवकरच म्यानेजर आले. ते आल्या आल्या जमलेल्या लोकांनी त्यांना घेरलाच. एकच गलका उडाला. जोतो त्यांना विचारू लागला. आमचे पैसे वापस द्या असं म्हणू लागला. नुसता गोंधळ माजला होता. नाही म्हणलं तरी १५, २० लोकं तरी असतील. काही शहाण्या लोकांनी उगा अब्रू चव्हाट्यावर यायची नाहीतर पोलिस पकडून न्यायचे या भितीने गप गुमान काढता पाय घेतला होता; नाही तर संख्या अजून वाढली असती.
म्यानेजर साहेबांचं म्हणणं पडलं कि मी हि गोष्ट वरच्या बँकेला कळवली आहे. त्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाही.
लोकं म्यानेजर साहेबांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते आमचे पैशे परत द्या. नाही तर बदली दुसरे पैसे द्या असही म्हणत होते. नुसता गोंधळ चालू होता. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. बँकेचा सेक्यूरीटी खांद्याला गोळी नसलेली बंदूक अडकावून लोकांना हातानं पाखरं हुसकावल्यासारखं बाहेर काढत होता. पण लोकं काही ऐकत नव्हते. ते त्याच्या डावी, उजवी कडून परत येत होते.
असा सगळा गोंधळ चांगला पंधरा वीस मिनिटे चालू होता. 
एकाएकी पोलिसांची गाडी येउन बँकेबाहेर थांबली. कोणीतरी ओरडलं पोलिस आले, पोलिस आले. एक क्षणभर शांतता पसरली. पण परत गोंधळ सुरु झाला.लोकं पटापट बाहेर येऊ लागले. कोण पोलिसाच्या भितीने पळू लागलं.
कोणी तरी बँकेतूनच पोलिसांना फोन केला होता, असं आल्या आल्या एका हवालदारानेच सांगितलं.
त्याच हवालदाराने (सगळे शांत झाले होते तरीही) एकदा सगळ्यांना शांत रहा असा हात वर करून दम दिला आणि म्यानेजर साहेबांना काय प्रकार झाला ते विचारलं.
म्यानेजरनि सगळी परिस्थिती पोलिसांना सांगितली. पोलिस जेंव्हा जमावाकडे वळले तेंव्हा
त्या जमावात फक्त बबन्या आणि अजून चारच माणसं राहिली होती. बाकीच्या लोकांनी पोलीसांच झंझट नको म्हणून गप गुमान काढता पाय घेतला होता.
त्या प्रमुख हवालदाराने बबन्यालाच विचारलं.
"काय रे, नाव काय तुझं?"
"अ…अ बबन्या, आपलं …बबन."
"किती व्हते पैशे?"
"पाच हजार."
"तुला कोणी दिलते?"
"दोस्तानं दिलते."
"कोण दोस्त, त्याला कोणी दिले?"
"माहित न्हाई"
"दोस्त कोण माहित न्हाई व्हय रे."
"न्हाई … ते आमच्या गावचा टेलर, रम्या"
"काठीकवडे ह्याची जबानी घ्या" असा हुकुम त्यांनी सोबतच्या शिपायाला देऊन ते बाकीच्यांकडे वळले.
बबन्या सोबत इतरांच्या हि जबान्या झाल्या. पोलिस स्टेशन ला जाऊन एफ. आय. आर. देखील दाखल केली गेली अन् बबन्या शिक्के मारलेल्या नोटा घेऊन विचारातच गावाकडे परतला.
बबन्याला कळत नव्हतं कि आपण चांगलं केलं का वाईट केलं? एक मन म्हणत होतं चांगलंच झालं तर त्याला असंही वाटत होती कि आपण असल्या प्रकरणात फसायला नको होतं. आणि पुन्हा आपण रम्याचं नाव घेऊन त्याचा रोष अंगावर ओढून घेतला आहे. आता तोही आपल्याला सोडणार नाही. पण आपल्याकडे इलाजच नव्हता. एकदा आपण पोलीसापुढे दोस्ताचं नाव घेतलं परत आपण जबान बदलली असती तर ते आपल्यालाच जड गेलं असतं. कदाचित मारही पडला असता. पण गावातील एकंदर वातावरण पाहिल्यावर त्याच्या जिवात जिव आला. 
खुळेवाडीत देखील सगळ्यांच्या कानावर 'डुप्लिकेट' नोटांच्या गोष्टी येतंच होत्या. पण खरी मज्या दुसऱ्या दिवशी आली जेंव्हा पेपरात जिल्हा विशेष पानावर ठळक मोठी हेडलाईन आली. 'राजापूर तालुक्यात 'डुप्लिकेट' नोटांचा सूळसुळाट'. बातमी मध्ये खुळेवाडीच्या बबन्याचं देखील इतर चौघांसोबत नाव होतं.
मग काय म्हणता बबन्याचा 'भाव' रातोरात त्याच्या मालापेक्ष्याही वधारला. काल परवा पर्यंत बबन्या म्हणणारे आज बबनराव म्हणू लागले. जोतो यायचा आणि बबन्याला विचारायचा.
"काय राव कसं कसं झालं सांगा कि जरा?"
मग काय बबन्याची कळी खुलायची आणि सगळी हकीकत मीठ, मिरचू, कांदा, तेल, हळद जे (दुकानात) आहे नाही ते लाऊन सांगायचा.
काही दिवस बबन्याला त्याच्या 'माला' सकट भरपूर डिमांड आली होती. पण बबन्याची उधारी मात्र वाढत होती.
एखादा यायचा आणि त्याच्याकडून असली, 'नकली' किस्से ऐकून त्याला जरा गोड बोलून उधारी वाढवायचा. बबन्याने पैशाचं विचारलंच तर हजाराची नोट पुढे करायचा. बबन्या कसला हजाराच्या नोटेला हात लावतोय. त्यानं हजार अन् पाचशेची धास्तीच घेतली होती. आणि याचा फायदा गाववाले घेत होते.
बघता बघता दिवस जात होते आणि बबन्याची 'उधारी' वाढत होती.
खुळेवाडीत हे हाल होते तसेच काहीसे इतरही गावामध्ये होते, आमदारसाहेबांच्या संपूर्ण तालुक्यात 'डुप्लिकेट'चाच बोलबाला होता.
तालुक्यात आणि इतरही गावांमध्ये कोणीही हजार, पाचशेची नवीन नोट घेत नव्हते, काय सांगावं 'डुप्लिकेट' असेल तर!
'नव्या नवरीचे नऊ दिवस' संपले आणि बबन्याला कोण विचारीणा झालं. काही 'हितचिंतक' त्याच्या 'चिंता' वाढवु लागले.
"कशाला ह्या फंदात पडलास बाबा, पोलिसांचा नाद करु नये शान्या माणसानं"
"मोट्या माणसांचा हात असतोय असल्या प्रकरणात आपण उगी साक्षी, बिक्षी देत फिरू नये, उगा पुना आपल्याच अंगलट येतंय." अशी बोलणी बबन्याच्या कानी पडू लागली.
तो आता चांगलाच वैतागला होता. कारण उधारी वसूल होत नव्हती आणि माल भरायला जवळचे पैसेहि संपले होते आणि त्यात आता लोकं मनात काही, बाही भरवू लागले होते.
आणि अशातच एके दिवशी सकाळी सकाळी दोन शिपाई आणि एक हवालदार भरून आलेली जीप मारुतीच्या देवळासमोर थांबली. उतरल्याबरोबर त्यांनी बबन्याचं घर विचारलं. एका पोरानं ते आपलं 'कर्तव्य' मानून चोख काम केलं आणि बबन्या समोर आणून सगळ्यांना उभं केलं.
हातातली फायबरची काठी गोल फिरवत त्याच प्रमुख हवालदाराने विचारलं.
"बबन खूळवाडकर तूच का रे?"
पोलिसांना समोर बघून बबन्याची बोबडीच वळली. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही.
"अ…… हवो" बबन्या अडखळत कसं तरी बोलला.
"तुला त्या डुप्लीकेट नोटा कोणी देलत्या म्हणला?" हवालदाराच्या आवाजात जरब होती.
"टेलर न, रम्या नावयं त्यचं." बबन्या परत अडखळत बोलला.
 "चल, घर दाखव त्यचं." अस म्हणून त्यांनी बबन्याला दुकानाच्या बाहेर काढला.
"बायला, काहीच मेळ लागणा झालाय कुटनं आल्या एवढ्या नोटा ते, चार लोकांच्या चौकशा करून झाल्या पण अजून काही धागे दोरे जुळणा झालेत." बबन्या बाहेर आल्यावर त्याला उद्देशून हवालदार बोलला.
आतापर्यंत गावात पोलिस आल्याची बातमी कळलीच होती. देवळासमोर अर्ध गाव जमा झालं.
लोकांमध्ये कुजबुज चालूच होती. कोण म्हणत होतं, "आता बबन्याला पकडून नेतेत" तर कोणी "अरं नुसती चौकशी हाये हि" असं बोलत होते. तर कोणी सरळ पोलिसांनाच विचारण्याचं धाडस करत होते.
पोलिस बबन्याला घेऊन रम्याच्या घराकडे निघाले तसं काही मानसं, पोरं, ठोरांचीहि वरात त्यांच्या मागुन निघाली.
घर जवळ आलं. हवालदाराने बबन्याला दार वाजवण्याची खून केली त्याप्रमाणे बबन्याने दार वाजवलं.
दार रम्यानंच उघडलं.
रम्या दिसल्या दिसल्या बबन्या ने नाव उच्चारण्याच्या आधीच हवालदाराने रम्याला धरला.
"डुप्लीकेट नोटा छापतो व्ह्य रे?" असं म्हणून एक कानाखाली ठेऊन दिली आणि मग विचारलं
"मशिन कुठाय सांग?"
"कोणच्या नोटा सायेब, कसली मशीन?"
"ज्या नोटा तू ह्याला दिलत्यास." बबन्या कडे बोट करून हवालदार बोलला. 
"सायेब त्या नोटा म्या, ए टी एम मदनं काडल्या व्हत्या"
"खरं सांग इथच सगळं, स्टेशनला गेल्यावर लई महाग पडल" गचांडी धरून हवालदार ओरडला.
"खरंच सांगतूय वो, म्या न्हाई छापल्या."
"मग कोणी छापल्या?"
"मला काय म्हाइति"
"काठीकवडे ह्याला घेऊन चला आपल्या सोबत, हा असा न्हाई ऐकायचा" असं म्हणून हवालदाराने वरात आल्या पावली परत जीपपर्यंत चालवली. पोलिसांनी रम्याच्या मुसक्या बांधल्या होत्या अन् त्याला पुढं पुढं ढकलत नेत होते. बबन्या मोकळाच होता. 
हवालदाराचा चेहरा उजळलेला होता. काहीतरी पुरावा हाती लागला आहे हे हवालदाराचा चेहराच सांगत होता.
पोलिसांची जीप आल्यामार्गाने धुरोळा उडवत परत गेली. फक्त दोन लोकं जास्त घेऊन गेली. बबन्या आणि रम्या.
रम्या पेशाने टेलर पण गुंड प्रवृतीचा होता, गावातील भांडणात त्याचा सक्रिय सहभाग असायचा. एकाच्या डोक्यात काठी घातल्यामुळे तो आठ दिवस पोलिस कोठडीतहि जाऊन आला होता. भावकीच्या भांडणात तो नेहमी पुढं असायचा. रम्याच्या ओळखीहि जबर होत्या. आमदार, खासदार लोकांपर्यंत रम्याची ओळख होती तसंच सराईत गुंड, घरफोडेहि त्याला ओळखत. त्यामुळे गावातील लोक त्याच्याशी वैर नकोच म्हणायचे. नोटा छापण्यात याचा हात असू शकतो अशी शंका हवालदाराला येणं, हे साहजिकच होतं.
खरं तर रम्या घरी नाही हे बबन्याला माहित होतं. कारण बबन्या त्याच्या घरी एक,दोन वेळेस आला होता त्याला हेच सांगायचं होतं कि, मी तुझं नाव पोलिसांना अनावधानाने सांगितलय त्यामुळे तू कुठे तरी पळून जा. पण रम्या भेटला नव्हता. रम्याच्या बायकोने ते गावाला गेलेत सांगितलं होतं. पण आज रम्याला घरी बघून बबन्यालाहि आश्चर्य वाटलं होतं. काल रात्रीच रम्या गावाहून परतला होता.
रम्याला पोलिसांनी धरला हि खबर हाहा म्हणता आसपासच्या गावात पोचली. इकडे आमदारांच्या गोटातहि पोचली अन् आमदार आणि त्यांचा उजवा हात असलेला बाबू यांची पाचावर धारण बसली.
रम्या आणि बाबू जानी दोस्त. दोघांनी बरीच चांगली, वाईट कामे सोबत केली होती. आणि बाबू मुळेच रम्याच्या ओळखी वाढल्या होत्या.
रम्याला पकडला हे समजल्यापासून आमदाराच्या पोटात मळमळायला लागलं होतं. सगळं रम्याच्या 'पोटातच' राहतंय का रम्या 'ओकतोय' ह्याचीच चिंता त्यांना लागून राहिली होती. तसं तर त्यांची तब्येत नकली नोटा पकडल्यापासूनच बरी नव्हती. आणि आज कधीनव्हे ते बाबुवर चिडले होते.
"तुला सांगत व्हतो हे असले धंदे नको मनुन, पण आमचं येकायचंच न्हाई नं" अंगणात येरझाऱ्या घालत ते बाबुवर उखडले.
"पण दादा, तुम्हीच तर म्हणले व्हते, इलेक्शनला पैशे न्हायीत मनुन; कुटून पण आना"
"हो, पण माजं मननं आपलं नेहमी परमानं कोणाला तरी धरायचा, काही तरी मंजूर करून पैशे उकळायचे"
"अवो त्यो बुवा मनला कि, कोणाला काईबी कळणार न्हाई, तुमी बिंदास वाट्टेल तेवढे घाणे काढा"
"अवो, घाणे काडायला ते काय जिलबी, भजे हेत का? ते मनला अन् तुमी ऐकलं. तुमी थांबलेबी कवा तर कागद संपल्यावर; शब्बास रे पठ्ठे".
"आता मंग तसला कागुदच कुटं भेटणा झाल्यावर कसं करणार?" बाबू निरागसपणे बोलला.
"लई शाना हाईस; ते मरुद्या जरा आता रम्या कडं ध्यान द्या, ते काहीबी वकायला नायि पाईजेल अन् त्याला काहीपण करून भायेर काडा. " एवढं बोलून आमदार परत येरझाऱ्या घालू लागले.
आमदाराचा निरोप घेऊन बाबू रम्याला बाहेर काढण्याच्या खटपटीला लागला.
रम्याला घेऊन पोलिस स्टेशनला आले आणि आल्याआल्या त्यांनी धुलाई सुरु केली. पण रम्या पण काही कच्या गुरूचा चेला नव्हता. तो पण बारा गावचं पाणी प्यालेला होता. तो पोलिसांना ताकास तूर लागू देईना. तो एवढंच म्हणायचा कि "म्या ए टी एम मदनं काडले". रम्या ला ठाऊक होतं कि बाबू काहीही करून आपल्याला बाहेर काढणार, फक्त अजून थोडी कळ सोसावी लागल.
पण रम्या आणि बाबूचं नशीब तेवढं जोरावर नव्हतं जेवढं पोलिसांचं होतं. दुसऱ्याच दिवशी रम्याला थर्ड डिग्री लावल्यावर काही टिकाव धरता आला नाही. आणि सगळं उलटून तो मोकळा झाला.
रम्यानं जबानी दिल्यावर पोलिसांनी पटापट सूत्र हलवली अन् बाबूच्या नावाने अटक वारंट निघालं. पण बाबूला हि खबर लागताच तो परागंदा झाला होता. आणि पोलिसांना सापडण्याचं नाव घेत नव्हता.
खरे गुन्हेगार सगळ्यांच्या नजरेसमोर आले होते. अन् गावकरी बाबू आणि आमदाराला (डुप्लीकेट नोटा दिल्या म्हणून) शिव्या घालत होते. एक गोष्ट मात्र खरी होती कि गावात बबन्याचा भाव त्याच्या मालासकट वाढला होता. जो तो बबन्याचं कौतुक करू लागला. बबन्यामुळंच सगळे पकडले गेले म्हणू लागला. पण त्याच्या मनात काही वेगळंच होतं. बबन्या आतून भेदरला होता त्याला माहित होतं, बाबू काही आपल्याला सोडणार न्हाई आणि गावात जर आपल्या नावाची अशीच चर्चा चालू राहिली तर तो अजूनच भडकेल. त्यामुळे बबन्याने हवापालट म्हणून गावातून पोबारा केला.
एक दोन दिवस गेले, गावातील बबन्याची चर्चापण आता बऱ्यापैक्की कमी झाली होती. लोकं आता निकालाचीच चर्चा करत होते. आणि तालुक्याचचं काय तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य 'राजापूर विधानसभेवरच होतं. 'डुप्लीकेट' वाले जुणे आमदारच येणार का लोकांना सत्तापालट पाहिजे ह्याचा निकाल दोन दिवसावरच येउन ठेपला होता. अन् निकालाच्या आदल्या दिवशीच पोलिसांनी बाबुला मुद्देमालासकट धरला अशी बातमी पेपरला आली.
बाबू नोटा छापायची मशीन समुद्रात टाकून द्यायला मुंबईला चालला होता. वाटेतच पोलिसांनी धरला.
ती मशीनही इम्पोर्टेड होती आणि बाबूने एका अमेरिकन माणसाकडून ती घेऊन तब्बल दोन करोड चाळीस लाख रुपये आत्तापर्यंत छापले होते. आणि त्यातले बरेचसे इलेक्शनच्या कामामध्ये 'वाटले' होते.
निकाल लागून आठ दिवस झाले. तसं बबन्या आपल्या गावाकडे निघाला, आत्तापर्यंत सगळं स्थिरस्तावर झालं असेल असा अंदाज त्याने बांधला होता. वेशीवरच त्याला सुताराचा पक्या भेटला. 
"काय पक्या कुणिकडं?" बबन्याने त्याला विचारलं. 
"म्या व्हय, चाललोय राजापूरला अन् शाना असशील तर तू पण चल."
"का रं, असं का म्हनतुयास?" बबन्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 
"अरं ते बाब्या जामिनावर सुटलंय आणि पोलिसात केस करणाऱ्याच्या मागं हाये."
बबन्या काय समजायचं ते समजला आणि आपल्या गावची वाट चालू लागला. 
खरं होतं, बाबू सुटला होता कारण जुने आमदारच परत निवडून आले होते. अखेर विजय 'डुप्लीकेट' लोकशाहीचाच झाला होता.